28/04/2017
‘चल कहीं दूर निकल जाये’
कंटाळलात ना ? या रोजच्या त्याच त्याच कामाला, या शहरी धकाधकीच्या आयुष्याला. आजकाल आपलं आयुष्यच एवढं व्यस्त आणि स्पर्धेचं झालंय की, आपल्याला स्वत:चं आयुष्य जगण्यासाठी वेळच मिळत नाही. असं म्हणतात की, ‘खूप जगा, दुनियेचा आनंद लुटा.’ पण आपण पैशाच्या मागे एवढं धावत असतो की, आपण आपलं जगणंच आपण विसरून जातो. आपण नेहमीच वैतागलेले असतो, चाकरमानी असेल ऑफिसच्या त्याच-त्याच कामांना, गृहिणी असेल तर घरच्या छोट्या-मोठ्या कामांना, घरच्या जबाबदाऱ्या पेलून ती अगदी थकून जाते. मुलं असतील तर अभ्यासाला, सगळेच त्रासून गेलेलो असतो. नैराश्येत जगत असतो. या सर्वांचा परिणाम होतो आपल्या कामावर, आपल्या व्यैयक्तिक जीवनावर, आपल्या माणसांवर. मग आता याला पर्याय काय? प्रत्येक गोष्टीला जसं उत्तर असतं तसा आपल्याकडे पर्याय सुद्धा आहे, ‘खूप फिरा, स्वस्थ राहा’. थोडसा वेळ काढून आपण आपल्या माणसांसमवेत, आपल्या परिवारासोबत चार सुखाचे क्षण घालवण्यासाठी एखाद्या शांत ठिकाणी, निसर्गाच्या सानिद्ध्यात रोजच्या आयुष्यातला त्रास विसरण्यासाठी सहलीला जायचं. मग आता कुठे जायचं, किती दिवसांसाठी जायचं, कसं जायचं या सगळ्यांचं प्लानिंग करायला नको का? कोणाला समुद्र किनारा हवा असतो, तर कोणाला नवनवीन शहरं, कोणाला गड-किल्ले सफर करायचे असतात तर कोणाला परदेशात जाऊन ब्रिटीशांचा इतिहास जाणून घ्यायचा असतो. वेगवेगळ्या राज्यांमधल्या, देशांमधल्या लोकांची कला, सांस्कृतिक वारसा, त्यांचे राहणीमान, त्यांचा स्वभाव, त्यांच्या भाषा असं सर्वच जाणून घ्यायचं असतं. यामध्ये पण काही शहरं, त्यातील वास्तू अशा असतात की, काळ कितीही बदलला, नवनवीन पिढ्या आल्या तरीही त्या वास्तूंचा आपलेपणा, त्या वास्तूला जाणून घेण्याची ओढ, आतुरता कायम राहते.
काही दशकांपूर्वीचा काळ असा होता की, लहान मुलांना सुट्ट्या लागल्या की, शहरात असणारी चाकरमानी मंडळी थोड्या दिवसांसाठी का होईना रजा घेऊन गावी जायचे. पण आता हे गावी जाण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. याला कारणही आपणच आहोत. एक तर वाढत्या शहरीकरणामुळे गावे ओस पडली आहेत आणि दुसरं म्हणजे खेड्यापाड्यांचे शहरीकरण होत आहे. त्यामुळे शहर आणि गाव यामधील तफावत आता कमी झाली आहे. बहुतेकदा गावी न जाण्याचं कारण असं की, गाव आहे पण तिथे राहायला माणसंच नाहीत. त्यामुळे आजकालच्या सुट्ट्यांचा बेत हा सहसा गावी जाण्याचा नसून एखाद्या पर्यटनस्थळी जाण्याकडेच आहे.
कालिकाई मनोकामनाच्या या अंकात आपण विविध पर्यटन स्थळांची माहिती तर घेणारच आहोत, पण त्या जोडीला एक कळकळीची विनंती पण करावीशी वाटते. तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यातला शीण विसरण्यासाठी, नवे काही जाणून घेण्यासाठी, मनाची रिफ्रेशमेंट करण्यासाठी खूप फिराच पण नवीन ठिकाणी गेल्यावर तिथल्या नियमांचं पालन करा, स्वच्छता राखा, त्या वास्तूंचं, ठिकाणाचं, त्याच्या सौंदर्यतेचं जतन करा. कारण त्या वास्तुच त्या-त्या शहराचं प्रतिनिधित्व करत असतात. आपण आपल्या घरात, आपल्या सभोवतालच्या परिसरात जशी स्वच्छता राखतो त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी आपण जाऊ, त्या ठिकाणाची, त्या शहराची सुद्धा स्वच्छता राखणं, त्यांच्या नियमांचं पालन करणं ही सुद्धा आपली जबाबदारी नाही का?
चला तर मग ‘खूप फिरा आणि स्वस्थ राहा.’
__________________________________________
तुमच्या सारख्या रसिक आणि चोखंदळ वाचकांनी गौरवलेले "कालिकाई मनोकामना" मासिक आता फेसबुकवर..
हे पेज like करा आणि नियमित अपडेट मिळवा.
https://www.facebook.com/manokamnamagazine/
आणि या मासिकाचे सभासद होण्यासाठी आजच नाव नोंदणी करा.
*संपर्क – ९८२०७९७८४८*