20/02/2025
छावा...!
आजवर कित्येक सिनेमे पाहिले असतील, क्वचित डोळ्यात पाणी देखील आलं असेल, सिनेमातला एखादा सीन अनेकदा मनात घोळवला असेन. थियेटरमध्ये स्वतःवर अंधार करून घेऊन समोरच्या पडद्यावर अनेक पात्र प्रकाशमान होताना पाहिली असतील. पण आज जे पाहिलं ते कल्पनातीत होतं. खच्चून भरलेल्या शांत थियेटर मध्ये आपसूक निघालेला स्वतःचाच हुंदका आज पहिल्यांदा ऐकलाय मी. सिनेमा संपल्यावर पायातले त्राण कमी झालेले याआधी कधीही जाणवले नाहीयेत मला. सिनेमा हॉल मधून बाहेर पडून, पार्किंगमध्ये चालत येई पर्यंत डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं, हे आज खरोखर घडलंय. आज पाहिलेला 'छावा', सिनेमा म्हणून उत्तम आहेच, पण आज हे सगळं घडण्यामागचं कारण म्हणजे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज.
शिवाजी सावंतांची छावा वाचली तेव्हा शाळेत होतो, अनेक संकल्पना तेव्हा नुकत्याच मनात रुजू लागल्या होत्या, अवती भवतीच्या गोष्टींविषयीच्या जाणिवा तितक्याशा प्रगल्भ झालेल्या नव्हत्या तरीही काळजाला विदीर्ण करणारा तो कादंबरीचा शेवट मला बऱ्याच काळासाठी हलवून गेला होता. कादंबरीचा तो शेवट आणि त्याचा परिणाम फार काळ माझ्यासोबत राहिला. पुढे जसजसं वाचन वाढत गेलं, जाणिवा समृद्ध होत गेल्या तसतशी स्वराज्याच्या दोन्ही छत्रपतींप्रती माझी श्रद्धा दृढ होत गेली. शिवाजी महाराजांविषयी खूप काही वाचलं, बाबासाहेब पुरंदरे, रणजित देसाई, गजानन भास्कर मेहेंदळे ह्या आणि आदी लोकांनी फार कष्टाने लिहिलेली ग्रंथ संपदा त्यात प्रामुख्याने येते, निनादराव बेडेकरांचं शिवाजी महाराजांच्या युद्ध कौशल्याचं, मुत्सद्दीपणाचं अभ्यासपूर्ण वर्णन असणारं आठ एक तासांचं व्याख्यान मी YouTube वर दरवर्षी एकदा तरी ऐकतोच. वाचून म्हणा किंवा ऐकून, शिवाजी महाराज कायम माझ्या आत झिरपत होते आणि मी त्यांना साठवत होतो. अनेक चित्रकारांनी काढलेल्या पोर्ट्रेट्समुळे, सिनेमां मध्ये साकारलेल्या पात्रांमुळे माझ्या मनात असणाऱ्या शिवाजी महाराजांना कुठला न कुठला तरी चेहरा कायम मिळत गेला, त्यामुळे आजही डोळे मिटले कि महाराजांची छवी डोळ्यासमोर उमटते. संभाजी महाराजांबद्द्दल मात्र असं कधी झालं नाही, संभाजी महाराजांचा चेहरा कधी डोळ्यासमोर साकारला जायचा नाही. विकी कौशल मुळे माझ्या मनातल्या संभाजी महाराजांना आज चेहरा मिळाला.
शिवाजी महाराजांच्या देहावसनानंतर वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी स्वराज्याच्या सिंहासनावर अभिषिक्त झालेला राजा. ज्याला फक्त बाह्य शत्रूंशीच लढा द्यायचा नव्हता तर टोकाचा गृह कलह सुद्धा निस्तरायचा होता. स्वराज्याचे चहू बाजूंनी लचके तोडण्यासाठी तयार असणाऱ्या मुघल, पोर्तुगीज, इंग्रज, आदिलशाही, कुतुबशाही यांच्या लाखोंच्या फौजांना उण्या पुऱ्या पंचवीस हजार मावळ्यांसह ज्याने नऊ वर्ष झुंजवत ठेवलं, स्वराज्याच्या सीमा वाढवल्या. संपूर्ण हिंदुस्थान चा बादशाह म्हणवून घेणारा औरंगजेब नऊ वर्ष ज्याला पकडण्यासाठी दक्खनेत येऊन झिजला असा राजा. ज्याच्यावर अनेक मावळ्यांनी हसत हसत जीव ओवाळून टाकला असा राजा. तेरा भाषा जाणणारा, सतराव्या वर्षी संस्कृत ग्रंथ बुधभूषण लिहिणारा राजा, वयाच्या एकतिसाव्या वर्षी आपल्या धर्मावर अडिग राहून बलिदानाची परिभाषा लिहिणारा राजा. कितीही लिहिलं तरी कमी पडेल असं एक वादळ होते संभाजी महाराज. त्यामुळे पडद्यावर त्यांचं आयुष्य साकारणं हि फार मोठी जबाबदारी होती. जे काही प्रमाणात लक्ष्मण उतेकर यांना साधलं आहे. पण ह्या भूमिकेला पूर्ण न्याय विकीने दिला आहे हे सिनेमा पाहताना वारंवार जाणवत राहत. संभाजी महाराज वावरत असणारी प्रत्येक फ्रेम न फ्रेम डोळ्यात साठवून ठेवावी अशीच आहे. महाराजांच्या बरोबरीने लढणारे मावळे, त्यांचं महाराजांप्रती असणारं समर्पण, प्रेम संपूर्ण सिनेमाभर ठळक दिसून येतं. अर्थात ह्याच श्रेय अभिनेते आणि दिग्दर्शक ह्यांना नक्कीच जातं. कवी कलश साकारणारा विनीत कुमार सिंग नक्कीच लक्षात राहतो. छावा ह्या सिनेमाचा प्राण मात्र विकी कौशल आहे.
शिरस्त्राण परिधान केलेले योद्धा संभाजी महाराज, राज्याभिषेकावेळी सिंहासनावर विराजमान असणारे छत्रपती संभाजी महाराज, छंदोगामात्य कलशांसोबत काव्यशास्त्रविनोदामध्ये रमणारे कवी संभाजी महाराज, भाषाविद संभाजी महाराज, इथपासून ते स्वराज्याच्या यज्ञवेदीवर स्वतःच्या बलिदानाची आहुती देणारे धर्मवीर संभाजी महाराज, कोणत्याही पात्राला, ऐतिहासिक व्यक्तीला जेव्हा चेहरा मिळतो, तेव्हा ती व्यक्ती आपल्यासाठी आपल्यासारखीच हाडामांसाची होते, ती ऐतिहासिक व्यक्तिरेखा जिवंत होते, आणि त्या व्यक्तीने सोसलेल्या यातना देखील जिवंत होतात. वारंवार ऊर कधी अभिमानानं तर कधी कौतुकानं भरून येत होता आणि शेवटी तर हृदय पिळवटून टाकणाऱ्या यातनेने हुंदका बाहेर पडला. औरंगजेबाने अनन्वित अत्याचार करूनही त्याला शेवट पर्यंत भिक न घालणारा माझा राजा , संभाजी महाराजांचा रुबाब, थाट, आणि मुख्य म्हणजे शिवाजी महाराजांच्या बेदरकार मुलाचा अटीट्युड त्याच्या ठायी दिसतो. शेवटच्या काही प्रसंगांमध्ये तरसांच्या टोळक्यात सिंह अडकावा, आणि त्याने आपल्या रौद्र रूपात संहारसत्र सुरु करावं असा भास होत राहतो. संभाजी महाराजांचं रौद्र रूप पडद्यावर पाहताना अंगावर काटे उभे राहतात. आपल्याला थिएटर मध्ये खुर्चीत बसून समोर हे सगळं दुष्टचक्र घडत असताना हेल्पलेस वाटत राहतं, एखादा तरी वार आपण जाऊन आपल्या अंगावर झेलून घ्यावा असं वाटत राहतं. हे घडायला नको होत असं वाटत राहतं आणि संभाजी महाराज तेव्हा बंदी झाले नसते तर आज भारत कसा आणि कुठे असला असता ह्याचा विचार केला तरी आज आपण किती तोट्यात आहोत ह्याची जाणीव कुठे तरी होत राहते.
देश धर्म पर मर मिटने वाला, शेर शिवा का छावा था.
महापराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था.
तेज पुंज तेजस्वी आँखें, निकल गयी पर झुका नहीं.
दृष्टि गई पर राष्ट्र उन्नति का,दिव्य स्वप्न तो मिटा नहीं.
छावा !
..
-किरण पावसे
१६-फेब्रुवारी-२०२५ (१०:३५)