29/08/2017
रेशीम शेड निर्जंतुकीकरण महत्त्वाचे…
रेशीम शेड निर्जंतुकीकरण महत्त्वाचे…
रेशीम शेती उद्योगातील यश हे शेडमधील निरोगी वातावरण, स्वच्छता, सकस तुतीचा पाला व योग्य व्यवस्थापन या चतुःसूत्रीवर अवलंबून आहे.
त्यापैकीच निर्जंतुकीकरण हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
प्रति शंभर अंडीपुंजांपासून ८० ते १०० किलो कोषांचे उत्पादन होण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी शास्त्रीयदृष्ट्या निर्जंतुकी करणास अधिकाधिक महत्त्व देणे गरजेचे आहे.
आज जागतिक पातळीवर कोषोत्पादनाचा विचार करता रेशीम शेती उद्योगात पुढारलेल्या चीन, जपान यांसारख्या देशांमध्ये रेशीम अळ्यांवरील रोग व किडींमुळे कोषोत्पादनात फक्त दोन टक्के नुकसान होते, तर भारतात तेच प्रमाण जवळपास २५ टक्क्यांच्या आसपास आहे.
निर्जंतुकीकरण म्हणजे रेशीम अळ्यांना रोगजंतूंच्या संसर्गापासून दूर ठेवणे.
प्रत्येक शेतकऱ्याने रोगजंतूंचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्जंतुकीकरणाचे तंत्र आत्मसात करणे गरजेचे आहे.
संपूर्ण वर्षभरात प्रत्येक कीटकसंगोपनानंतर निर्जंतुकीकरणाच्या वेळापत्रकाची आखणी करावी. त्याप्रमाणे नियोजन करावे.
प्रत्येक रेशीम उत्पादक शेतकऱ्यास रोगजंतूंचे कीटकसंगोपनगृहात येण्याचे मार्ग, रोगजंतूंचा विविध मार्गांनी होणारा प्रसार, रोगजंतूंना रोखण्याचे भौतिक व रासायनिक उपायांची माहिती असणे आवश्यक आहे.
बऱ्याचदा शेतकरी निर्जंतुकीकरणाचे शास्त्रीय महत्त्व माहीत नसल्याने अज्ञानापोटी निर्जंतुकीकरणास विशेष महत्त्व देत नाहीत.
परंतु यामुळे दर्जेदार कोषोत्पादनावर परिणाम होतो.
हे टाळण्यासाठी प्रत्येक रेशीम शेतकऱ्याने प्रभावी निर्जंतुकीकरण कार्यक्रम प्रत्येक कीटकसंगोपनाच्या वेळी राबविलाच पाहिजे.
अ) कीटकसंगोपनगृहात रोगप्रादुर्भाव होण्याचे विविध मार्ग :–
1) अंडीपुंज कागद अथवा अंडीपुंज पेटी.
2) कीटकसंगोपनगृह व परिसर.
3) कीटकसंगोपन साहित्य.
4) खत खड्डा.
5) कीटकसंगोपन हाताळणाऱ्या व्यक्ती, कीटकसंगोपनास भेटी देणाऱ्या व्यक्ती.
6) कीटकसंगोपनातील तांत्रिक त्रुटी.
7) तुती बाग.
8) कोष खरेदी केंद्रे.
9) स्वतःचे शास्त्रीय अज्ञान.
**नवीन तंत्रज्ञान अभ्यासा :–
रेशीम शेती उद्योगाबाबतीत इतर पिकांच्या तुलनेत विचार करता तितकासा अनुभव शेतकऱ्यांना नसतो.
तसेच कुटुंबातील सर्वच सदस्य रेशीम शेती उद्योगाबाबत अनभिज्ञ असल्याने कीटकसंगोपनाच्या वेळी त्यांची देखील मदत मिळत नाही.
नव्याने रेशीम शेती उद्योग करीत असलेल्या रेशीम शेतकऱ्यास कोषोत्पादन कमी होण्याची कारणे, रोगजंतूंचा प्रसार, त्याची कारणे, माध्यमे, रोगजंतू प्रसारास आळा घालण्याचे मार्ग, कोषोत्पादनासाठी निर्जंतुकीकरणाचे महत्त्व, निर्जंतुकीकरण म्हणजे काय, निर्जंतुकीकरणातील विविध पद्धती, रासायनिक निर्जंतुकीकरणातील रसायनाची माहिती, त्याचे प्रमाण, वापरण्याच्या पद्धती, अवस्थेनुसार मात्रा इत्यादींबाबत शास्त्रीय माहिती नसल्याने कीटकसंगोपनगृह व सभोवताल वातावरण निरोगी ठेवण्यास तसेच निर्जंतुकीकरणाची परिणामकारकता साधण्यास अडथळा येतो.
परिणामी कीटकसंगोपने यशस्वी होत नाहीत, अपेक्षित दर्जेदार व भरघोस कोषोत्पादन होत नाही.
हे लक्षात घेऊन नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा.
**अंडीपुंज कागद अथवा अंडीपुंज पेटी :–
१) अंडीपुंज निर्मिती केंद्रावर रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्यास नव्याने तयार झालेल्या अंड्यांवर रोगाचा संसर्ग होण्याचा संभव असतो.
तसेच अंडीपुंज निर्मिती केंद्र ते शेतकरी कीटकसंगोपनगृह या दरम्यान अंडीपुंजांच्या वाहतुकीत वातावरणात असलेल्या रोगजंतूंचा अंड्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते.
२) अंडीपुंज ज्या खोलीत ज्या चॉकी ट्रेमध्ये ठेवण्यात येणार आहे, त्याचे योग्य प्रकारे निर्जंतुकीकरण केलेले नसल्यासदेखील अंडीपुंजांना रोगाचा संसर्ग होण्याची शक्यता असते.
**कीटकसंगोपनगृह व परिसर :–
१) मागील कीटकसंगोपन पूर्ण झाल्यानंतर लगेच कीटकसंगोपनगृहाचे शास्त्रीय पद्धतीने निर्जंतुकीकरण न केल्याने रोगकारक घटक कीटकसंगोपनगृहातच राहतात.
पुढील कीटकसंगोपन चालू झाल्यानंतर सक्रिय होऊन रेशीम कीटकांना रोगाचा प्रादुर्भाव होतो.
२) कीटकसंगोपनगृह उघड्या गटाराजवळ, जनावरांच्या गोठ्यालगत, खत खड्ड्यालगत असल्यास रोगवाढीस सुयोग्य वातावरण मिळते.
यामुळेदेखील रोगजंतूंचा प्रसार होण्यास मदत मिळते.
**कीटक संगोपन साहित्य :–
१) बऱ्याचदा मागील संगोपन पूर्ण झाल्यानंतर संगोपन साहित्याच्या वेळीच निर्जंतुकीकरण न करता तेच साहित्य पुढील संगोपनाच्या वेळी वापरले जाते.
(उदा. चॉकी ट्रे, चंद्रिका वगैरे).
२) कधी कधी स्वतःकडील अपुऱ्या साहित्यामुळे शेजारील शेतकऱ्याकडील साहित्य वापरले जाते.
ते साहित्य जर निर्जंतुकीकरण केलेले नसेल तर अळ्यांना रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण होते.
**खत खड्डा :–
१) बऱ्याचदा शेतकरी कीटकसंगोपनगृहाच्या लगतच खड्डा करतात.
या खड्ड्यात मागील कीटकसंगोपनाच्या वेळी अळ्यांनी खाऊन शिल्लक राहिलेला पाला, फांद्या, रोगीष्ट अळ्या, अळ्यांची विष्ठा, वापरलेले कागद, कीटकसंगोपनगृहातील इतर केरकचरा इत्यादी उघड्यावर टाकतात.
२) खताचा खड्डा कीटकसंगोपनगृहालगतच उघड्यावर असल्याने हवेच्या झुळकेने खत खड्ड्यातील बुरशीजन्य रोगांचे बिजाणू कीटकसंगोपनगृहात प्रवेश करून अळ्यांना रोगाचा संसर्ग होण्याची शक्यता असते.
३) बऱ्याचदा कीटकसंगोपन संपल्यानंतर सदरचा केरकचरा, विष्ठा, वर्तमानपत्रे, तुती फांद्या खत खड्ड्यात न पुरता कीटकसंगोपनगृहाबाहेरच ढीग मारलेल्या अवस्थेत किंवा हवेने इकडे-तिकडे विखुरलेल्या अवस्थेत असतो.
परिणामी रोगाचा कीटकसंगोपनगृहात प्रादुर्भाव लगेच दिसून येतो.
**कीटकसंगोपन हाताळणाऱ्या व्यक्ती, कीटकसंगोपनास भेटी देणाऱ्या व्यक्ती :–
१) बऱ्याचदा कीटकसंगोपन हाताळणाऱ्या व्यक्तीस निर्जंतुकीकरणाचे तसेच निरोगी वातावरणाचे शास्त्रीय महत्त्व माहिती नसते.
परिणामी कीटकसंगोपनगृहात प्रवेश करण्यापूर्वी पायातील चप्पल न काढणे, हात-पाय साबणाने किंवा फॉर्म्यालिनच्या द्रावणाने स्वच्छ न करताच कीटकांना खाद्य (तुती पाला) देणे,
कीटकसंगोपनगृहातच तंबाखू-गुटखा खाणे, विडी-सिगारेट ओढणे, स्वयंपाक करणे,
बी-बियाणे, खताची पोती, अवजारे, कीटकनाशके ठेवणे.
यामुळे रेशीम अळ्यांना रोगाचा संसर्ग होण्याची शक्यता असते.
२) आजही महाराष्ट्रात कीटकसंगोपनगृहात वेगळी स्लिपर चप्पल व ऍप्रॉनचा वापर प्रचलित नसल्याने अंगावरील कपड्यांद्वारे देखील रोगाच्या बिजाणूंचा प्रवेश कीटकसंगोपनगृहात होऊन रोग प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण होते.
३) एकाच शेतकऱ्याकडे चॉकी व प्रौढ कीटकसंगोपन चालू असते.
हे दोन्ही संगोपन एकच व्यक्ती हाताळत असते, त्यामुळेदेखील चॉकी व प्रौढ कीटकसंगोपनास एकमेकांच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
४) गावातील इतर शेतकऱ्यांकडे चालू असलेल्या कीटकसंगोपनात रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल तर अशा ठिकाणच्या व्यक्ती इतर ठिकाणच्या कीटकसंगोपनात कुतूहलापोटी भेटी देती असतील तर अशा व्यक्ती रोग बिजाणूंच्या प्रसाराचे माध्यम बनून रोगजंतूंचा प्रसार होतो.
त्याचप्रमाणे तालुक्यातील, जिल्ह्यातील, राज्यांतील शैक्षणिक सहलीदेखील रोगजंतू प्रसाराचे माध्यम बनून रोगजंतूंचा प्रसार होण्यास साह्यभूत ठरतात.
**कीटकसंगोपनातील तांत्रिक त्रुटी :–
कीटकसंगोपनगृहात एकाच वेळी वेगवेगळ्या अवस्थेतील कीटकसंगोपन चालू असणे,
पाला शिल्लक राहतो म्हणून वर्षभर एकामागून एक खंड न देता सलग कीटकसंगोपन घेणे,
कीटकसंगोपनगृहात आवश्यक तापमान व आर्द्रता न राखणे,
रेशीम अळ्यांना शिळा, पिवळा, रोगीष्ट, धूळयुक्त पाला खाऊ घालणे,
वेळच्या वेळी अनियमित वाढीच्या व रोगीष्ट अळ्या वेचून नष्ट न करणे,
ट्रे-रॅकमध्ये अळ्यांची प्रमाणापेक्षा दाटी असणे,
कीटकसंगोपनगृह स्वच्छ न ठेवणे,
अळ्यांना कातेवर (मोल्ट) बसविणे – उठविण्याची क्रिया योग्य रीतीने न होणे,
कीटकसंगोपनाच्या वेळी आवश्यकतेनुसार विरी गेलेला चुना – रेशीम किट औषधांचा वापर न करणे,
वेळोवेळी कीटकांची शय्या स्वच्छता न करणे
या सर्व बाबींमुळेदेखील अळ्यांना रोगाची बाधा होण्याची शक्यता असते.
**तुती बाग :–
१) बऱ्याच वेळा शेतकरी कीटकसंगोपन संपल्यानंतर कीटकसंगोपनगृहात शिल्लक राहिलेला पाला, अळ्यांची विष्ठा, रोगीष्ट अळ्या, वर्तमानपत्र कागद, काडीकचरा वगैरे खत खड्ड्यात न पुरता तुतीच्या बागेत खत होईल या उद्देशाने अथवा अज्ञानापोटी टाकतात.
परिणामी तुती बागेतील जमिनीवर, तुती झुडपांवर रोग पसरतो.
२) नवीन कीटकसंगोपनाच्या वेळी रेशीम अळ्यांना पाला तोडण्यासाठी शेतकरी तुती बागेत जातो त्या वेळी —
शेतकऱ्याचे पाय, चपला, अंगावरील कपड्यांना रोगाचा बिजाणू चिकटतात,
त्याचप्रमाणे तुती पाल्यावरदेखील रोगजंतू चिकटून कीटकसंगोपनगृहात प्रवेश करून अळ्यांना संसर्ग होतो.
त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची पाळीव जनावरे अशा तुती बागेत गेल्यास जनावरांच्या अंगास, पायांना रोगाचे बिजाणू चिकटून रोगाचा प्रसार होतो.
**कोष खरेदी केंद्रे :–
कोष खरेदी केंद्रांवर पंचक्रोशीतून शेतकरी कोष विक्रीस आणतात.
या ठिकाणी चांगले, रोगट सर्वच प्रकारचे कोष येत असल्याने कोषांच्या बारदाण्याद्वारे देखील रोगाचा प्रसार होण्यास मदत होते.