21/05/2025
लेखक : प्रीतम मांडके
नुकतीच भारताने पाकिस्तानला युद्धभूमीवर ऑपरेशन "सिंदूर"द्वारे धूळ चारली. भारताशी आगळीक केल्यास याचा परिणाम किती गंभीर होऊ शकतो याची जाणीव शत्रू राष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला झाली.
युद्धाच्या बातम्यांमध्ये काही आर्थिक बाबींशी निगडित महत्त्वाच्या बातम्या या काळात दुर्लक्षित राहिल्या. ज्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने पाकिस्तानला दिवाळखोरीपासून वाचवण्यासाठी सुमारे दीड अब्ज डॉलर्सचे पॅकेज जाहीर केले त्याचाच भारताबद्दल एक अहवाल प्रस्तुत झाला.
या वर्षाखेर भारतीय अर्थव्यवस्था जपानला मागे टाकून जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल तसेच पुढच्या दोन-तीन वर्षांमध्ये जर्मनीला मागे टाकून भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल असा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला. ज्या ठिकाणी दहा ते पंधरा अब्ज डॉलरच्या विदेशी चलन गंगाजळीवर पाकिस्तानच्या उड्या मारणं चालू आहे त्या ठिकाणी भारताची विदेश चलन गंगाजळी साठा तब्बल 690 अब्ज डॉलर्सच्या जवळपास पोहोचला. कोरोनानंतर भारत सातत्याने जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून नावारूपाला आला. भारताने निषेध नोंदवल्यामुळे पाकिस्तानला कर्ज देताना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने तब्बल 50 अटी घातल्या त्याचवेळी ॲप्पल सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतामध्ये आपले आणखी प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहेत.
या योजनेविरोधात नुकताच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ॲप्पल कंपनीला दिलेला इशारा आपल्या सर्वांनी बघितला असेल.
आता याच प्रकारे जर भारत पुढे जात राहिला तर काही काळात एक महासत्ता म्हणून जगभरात भारताचा दबदबा आणखी वाढणार हे निश्चित.
याबाबतीत "थ्री इडीयट्स" सिनेमातला एक डायलॉग आठवतो "दोस्त एक्झाम मे फेल हो गया तो बुरा लगता है लेकिन फर्स्ट आया तो और भी बुरा लगता है "
सध्या भारताच्या बाबतीत हे चालू आहे. वर्षानुवर्षे महासत्ता म्हणून मिरवलेल्या किंवा नुकतेच मागील दशकात महासत्ता म्हणून उदयाला आलेल्या बड्या राष्ट्रांना भारताचे हे यश बघवले जाईलच असे नाही त्यामुळे कधी व्यापार युद्धात तर कधी प्रत्यक्ष रणांगणावर भारत कसा गुंतून पडेल यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न चालू आहेत. युद्धभूमीवर सपाटून मार खाल्ल्यावर कांगावा करणे ही जशी पाकिस्तानची रणनीती आहे तसेच भारताला अस्थिर ठेवून त्याच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करणे ही सध्या जगातील काही बड्या राष्ट्रांची रणनीती आहे. कंगाल पाकिस्तानला गमावण्यासारखे काही नाही परंतु भारताने या सापळ्यात अडकता कामा नये.
भारतातल्या विशेषतः सर्वसामान्य नागरिकांनी भावनेच्या आहारी न जाता भारतीय लष्करावर पूर्ण विश्वास ठेवणे गरजेचे आहे. प्रपोगंडा मेसेज पासून दूर राहून आपली विवेक बुद्धी जागृत ठेवावी. तरच स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत भारताला पुन्हा एकदा विश्वगुरू बनवण्याचे आपले स्वप्न साकार होईल.
लेखक : प्रीतम मांडके