20/06/2022
देव / मंदिर म्हणजे एक प्रकारचा व्यवसाय झालाय का ?
१०००/- रु. ( एक हजार रुपये ) द्या आणि नैवैद्य दाखवा.
वेळ साधारण दुपारी ३ ते ४ च्या दरम्यानची माझ्या नात्यातील एका व्यक्तीची यात्रा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एका म्हसोबाच्या ठिकाणी होती.(मुद्दाम गावाच्या नावाचा उल्लेख टाळतोय.)
एक गरिबीतून प्रचंड कष्टाने उभारलेले हे कुठुंब प्रचंड श्रद्धाळू आहे. गावामध्ये गवंडी काम करून आपल्या मुलाला आणि मुलीला शिक्षण देणारे आमचे भाऊ (सर्वजण आदराने म्हणतात.) साधारण एक दीड वर्षापूर्वी भाऊंची पत्नी त्यांना सोडून देवाघरी गेली. त्यानंतर भाऊंनी आपल्या लाडक्या लेकीचे लग्न लाऊन दिले. मुलगा नोकरीला लागलेला होताच मग पूर्वी काही केलेला नवस असेल किंवा भाऊंची इच्छा म्हणून भाऊंनी यात्रा करायचे ठरवले मग एखदा का मनाने ठरवले कि आता कार्यक्रम करायचा कि मग तो केलाच पाहिजे ना !
भाऊंनी सर्वप्रथम मंदिरात असणाऱ्या पुजाऱ्यांनी गाठ घेतली आणि कार्यक्रम व त्याची रूपरेषा ठरवली. आणि ठरले कि कार्यक्रम १८/०६/२२ ला करायचा मग गावामध्ये भावकीतील सर्व लोकांना आमंत्रण धाडले गेले. भाऊ यात्रा आणि गाव घेऊन पोहचले तिथे पोहचल्यावर सर्व गोष्टी घडत गेल्या. पूर्वी ज्यांची भाऊंनी गाठ घेतली होती त्या पुजाऱ्याची मंदिरातून हकालपट्टी झालेली होती हा पहिला धक्का !
भाऊंनी तरी आपल्या आलेल्या सर्व पै- पाहुण्यांची योग्य ती सर्व सोय केली. सर्व जेवण बनवून तयार झाले आणि भाऊ केले नैवैद्य दाखवायला स्वतःच्या मुलाला घेऊन.
तिथे गेल्यावर पहिले वाक्य ऐकायला मिळाले.
५००/- रुपयात मी नैवैद्यच दाखवणार नाही !
अशी ताठर भूमिका तिथे असलेल्या किंबहुना दारू पिऊन बसलेल्या पुजाऱ्याने घेतली.
१०००/- द्या त्याशिवाय मी नैवैद्य दाखवणार आणि दाखवू पण देणार नाही.
भाऊंचा पूर्ण हिरमोड पोटाला चिमटे घेऊन पैश्याला पैसा लावून दिवस रात्र गवंडी काम करून पैसे कमवायचे यात्रा करायची आणि इथे नैवैद्य दाखवायला १०००/- द्यायचे हे काही भाऊंच्या मुलाला पटले असे दिसले नाही म्हणून त्याने त्यांना जाब विचारला तर तिथून सरळ सरळ उत्तर आले. जा काय करायचे ते करा.! त्यांना खूप म्हणजे खूप वाद घातला पण तो दारू पिऊन बसलेला पुजारी तो स्वतःच्याच गुरमित आणि मस्तीत उत्तरे देण्यात व्यस्त होता. शेवटी शेवटी तर तो बोलला कि १०००/- नाही दिले तर इथे नैवैद्यच दाखवू देणार नाही.
मग मनाला प्रश्न पडतो कि हे सर्व कोरोना च्या काळात मंदिरे बंद होती. सर्व लोक बाहेरून दर्शन घेऊन जाऊन बाहेरूनच नैवैद्य दाखवत होती मग त्यावेळी झालेली त्यांचे हे नुकसान तर भरून काढत नाहीत ना हे .
देवाच्या नावर लुटण्याचे हे धंदे कधी बंद होणार आहेत. या लोकांना केव्हा अक्कल येणार आहे. कि हे अशेच देवाच्या आणि लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेऊन जगणार आहेत. देवाच्या नावावर लोकांना भीती दाखवून हे लोकांना कडून एक प्रकारे खंडणीची मागत आहेत ना !
जाता जाता फक्त एकच सांगतो
फक्त देवाला भीत जावा. कारण ज्या दिवशी तो ठरवेल ना त्या दिवशी तुमचे काही खरे नाही. तो नेहमी तुम्हाला देतच आला आहे तो तुम्हाला देतच राहील पण ज्या दिवशी तो माघारी घेईल ना त्या दिवशी तो तुमचे पैसे,घर,गाडी,बंगला,मान,प्रतिष्ठा घेत नाही ते फक्त तुमचे “श्वास” घेतो आणि तुमचा खेळ खल्लास होतो.
शुभ रात्री.