इन्शुरन्स: तुमचे विमा संरक्षण पुरेसे आहे का?
विमा खरेदी करून आपण आपली आर्थिक जोखीम विमा कंपनी बरोबर वाटून घेत असतो. पॉलिसी घेतल्यानंतर आपली जोखीम सुरक्षित झाल्याचा बहुतेकांचा समज असतो. मात्र, वास्तविक पाहता क्लेमच्या रकमेतून नुकसान पूर्णपणे भरून निघते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ,आरोग्य विमा संरक्षण नसल्याने केवळ आर्थिकच नव्हे तर भावनात्मकदृष्ट्याही नुकसान सहन करावे लागते. जेव्हा विमा सं
रक्षण अपुरे असते आणि क्लेम केल्यानंतर अत्यंत कमी रक्कम हाती पडल्यानंतर अनेक अडचणी येतात. या विषयी...
० आयुर्विमा : पुरेसे आयुर्विमा संरक्षण असेल तर कुटुंबाला आपली जीवनशैली सध्याच्या जीवनशैलीप्रमाणे राखण्यात काहीच अडचण येत नाही. समजा तुम्हाला कंपनी, कार्यालयाकडून विमा संरक्षण मिळत असेल तर नोकरी बदलल्यानंतर विमा संरक्षणावर परिणाम होऊ शकतो. नव्या कंपनी, कार्यालयाकडून तेवढ्याच रकमेचे विमा संरक्षण मिळाले नाही किंवा काही नव्या अटी पॉलिसीत असतील तर फरक पडू शकतो.
नोकरी बदलल्यानंतर उत्पन्न, बचत आणि वार्षिक खर्चाचा आढावा घ्या आणि त्यानुसार आपले विमा संरक्षण करून घ्या. बदलत्या स्थितीत जास्तीचे विमा संरक्षण घेणेही आवश्यक ठरते. कुटुंबाच्या भविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा विमा नसेल तर वित्तीय सल्लागाराच्या मदतीने विमा निश्चित करा.
० आरोग्य विमा : बर्याच वेळा अशी परिस्थिती असते की आरोग्य विमा संरक्षण कमी असते. नोकरी बदलल्यानंतर नवा आरोग्य विमा तत्काळ लागू होत नाही. समजा तुम्ही नुकतेच पदवीधर झाले असाल तुम्ही पालकांच्या विमा संरक्षण छत्राबाहेर जाता. दोन नोकर्यांच्या मधील काळात पुढची नोकरी केव्हा मिळेल हे निश्चित नसते. यातील थोडासा अवधी अनेकदा हैराण करतो. या काळात रुग्णालयाचे पूर्ण बिल खिशातून भरावे लागते.
०गृह विमा : हा विमा थोडासा किचकट असतो. यात कोणकोणत्या जोखमीच्या बाबी संरक्षित होतात आणि किती नुकसान कंपनी भरणार याची बहुतेक विमाधारकांना स्पष्ट कल्पना नसते. त्यामुळे गृहविमा पॉलिसीत कोणकोणच्या जोखमीच्या बाबींना संरक्षण आहे आणि कोणकोणत्या जोखमीच्या बाबींना संरक्षण नाही हे जाणून घेणे अत्यावश्यक ठरते. विमा संरक्षण लाभलेल्या घटनेतून घराचे नुकसान झाल्यास विमा कंपनी सध्याच्या बाजारभावाप्रमाणे भरपाई देईल असा बहुतेकांचा समज असतो. मात्र, अनेक पॉलिसीत एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच घराच्या दर्शनीमूल्यावर भरपाई आधारित असते.