21/10/2024
तुळजापूरसह जिल्ह्याचा कायापालट करणार !
तुळजापूर विधानसभेसाठी भाजपाकडून पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या जनसेवेच्या संधीबद्दल धन्यवाद..
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा, अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेला सोलापूर-तुळजापुर-धाराशिव रेल्वेमार्ग मागील ५ वर्षात आपण सर्वांनी मिळून मोठ्या ताकदीने अनेक महत्वपूर्ण प्रकल्प पुढे मार्गी लावण्याचे काम केले आहे. अनेक अडचणींवर आजवर मोठ्या हिंमतीने मात करीत आपल्या परिसराचा कायापालट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
मागील ५ वर्षात जी विकासकामे केली, त्याची पावती म्हणूनच भारतीय जनता पार्टीने आज पुन्हा एकदा तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. त्याबद्दल पक्षाच्या सर्व मान्यवर नेते मंडळींचे मनापासून आभार व्यक्त करतो. आपण मिळून खूप ताकदीने अनेक कामे पुढे नेली आहेत. वेगवेगळ्या संकटांवर मात केली आहे. पुढील काळात आणखी ताकदीने मिळून काम करायचे आहे.
मागील कार्यकाळात ज्या गोष्टी आपल्या सर्वांच्या साथीने पूर्ण करण्याचा शब्द दिला होता, जवळपास त्या सर्व बाबी महायुती सरकारच्या मागील अडीच वर्षात पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मागील २४ महिन्यांत मतदारसंघात २०० पेक्षा अधिक रस्ते मंजूर केले. अनेक कामे आता अंतिम टप्प्यात आहेत. तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेची सेवा करण्याची संधी यानिमित्ताने आपल्याला लाभली, हे आपले भाग्य आहे.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटक तुळजापूरला यावा, मुक्कामी रहावा यातून हजारोंच्या हाताला काम मिळावे, यासाठी आपले नियोजन सुरू आहे. त्यासाठीच २,००० कोटी रुपयांचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. मंत्रिमंडळाने त्याला तत्वतः मान्यताही दिली आहे. यातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मोठा रोजगार निर्माण होईल त्यासाठीच आपला अट्टाहास आहे.
पुढील काळात आपल्या भागासाठी अनेक महत्त्वाच्या योजना आणि प्रकल्प खेचून आणायचे आहेत. कृष्णा खोर्याचा विषय आपल्या साथीने लावून धरला. वर्षाखेरीस तुळजाभवानी देवीच्या चरणी पश्चिम महाराष्ट्रातील पाणी येईल. कौडगाव आणि तामलवाडी एमआयडीसीचे काम पूर्ण केल्याखेरीज आपल्याला स्वस्थ बसायचे नाही. तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर आणण्याचा विषय असेल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, निम्न तेरणा उपसासिंचन दुरुस्ती योजना असे अशक्यप्राय असणारे अनेक विषय केवळ अडीच वर्षाच्या आपल्या महायुती सरकारच्या सत्ताकालावधीत आपल्या सर्वांच्या मदतीने पूर्ण करता आले.
पीकविमा, अनुदानासाठी तसेच कोविड काळात सर्वांनी मिळून केलेली कामे सर्व जनतेच्या समोर आहेत. यापुढेही जनहिताची आणि विकासाची कामे करण्यासाठी आपल्याला बळ मिळाले आहे. केवळ तुळजापूरच नव्हे तर संपूर्ण धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकमेकांच्या साथीने मोठे काम उभे करायचे आहे. केंद्रात आणि राज्यात पुन्हा आपलेच सरकार असणार आहे. त्यामुळे आपल्या स्वप्नातील, आपल्या मनातील जे धाराशिव आहे, जे तुळजापूर आहे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकतीने काम काम करण्यासाठी आपले सर्वांची साथ, मला हवी आहे..
#तुळजापूर #भाजपा