21/07/2015
रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेत वित्तीय साक्षरता जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन संपन्न
नाबार्ड स्थापना दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने वित्तीय साक्षरता जागरुकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक, नाबार्डच्या जिल्हा प्रबंधक नंदा सुरवसे, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी बाळासाहेब पाटील, अलिबाग पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी विणा सुपेकर, लीड डेव्हलपमेंट ऑफिसर टी.मधूसूदन, आर सेटीचे विभागप्रमुख कुंभार, तंत्र अधिकारी गणेश बावडे आदी मान्यवर व बचतगटाच्या महिला, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना अपर जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे यांनी सांगितले की पंतप्रधान जनधन योजना जिल्हयात चांगल्या पध्दतीने राबविली जात असून या योजनेचा लाभ अनेक लोकांनी घेतलेला आहे त्यामाध्यी आरडीसीसी बँकेचे चांगले योगदान असून बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक यांचे त्यांनी कौतुक केले.शिवाय या योजनेत दोन लाख पेक्षा अधिक जनधन योजनेची खाती उघडली गेली असून याचा लाभ जिल्हयातील नागरिकांना मोठ्या संख्येने होणार आहे. जनधन योजनेबरोबरच अन्य योजनांचा नागरिकांनी चांगला उपयोग करून घेतला, तर त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास वेळ लागणार नाही असेही ते म्हणाले.
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बँकेच्या विविध योजनांचे महत्त्व पटवून दिले.ज्यामध्ये शेतीसाठी शून्य टक्के दराने पीककर्ज , जिल्ह्यातील बचतगटांना व्यवसायाच्या संधीसाठी दिले जाणारे कर्ज आणि तसेच किसान क्रेडीट कार्डचे महत्त्व पटवून देताना रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वित्तीय साक्षरतेचे कार्यक्रम जे.एल.जी.आणि बचतगटांच्या स्थापनेच्या माध्यमातून करत असून या सर्व योजना लोकांसाठीच आहेत याचा लाभ जिल्ह्यातील लोकांनी आणि अधिकाधिक शेतक-यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
वित्तीय साक्षरता या कार्यक्रमाअंतर्गत विविध योजनेवर शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी नाबार्डच्या जिल्हा प्रबंधक नंदा सुरवसे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये नाबार्डच्या असणा-या योजनांचा उल्लेख केला तसेच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये नाबार्ड कार्यरत असून असे अनेक उपक्रम राबविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असे त्यांनी आपल्या भाषणामध्ये नमूद केले. त्याचप्रमाणे एल.डी.एम.टी.मधुसूदन यांनी आपल्या भाषणामध्ये बँकेचे महत्त्व लोकांना पटवून दिले ज्यामध्ये ग्रामीण भागातील लोकांनी सावकारापासून दूर राहून बँकेत आपल्या ठेवी ठेवाव्यात आणि सुरक्षित व्यवहार करावेत असे आवाहन केले.तसेच रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आयटी विभाग प्रमुख मंदार वर्तक, प्रशांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाबार्डच्या अधिकारी नंदा सुरवसे यांनी तर सूत्रसंचालन संदिप जगे यांनी केले.